यावल प्रतिनिधी | यावल तालुक्यातील डांभुर्णी येथून केळीचे घड घेऊन शेतामध्ये मजुरीसाठी जात असलेल्या परिवाराचा दुचाकी घसरल्यामुळे कोलन्हावी गावाजवळ सोमवारी १५ जुलै रोजी अपघात झाला. या अपघातात विवाहितेच्या डोक्याला मार लागल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तुळसाबाई रमेश भील (वय २५, रा. कृष्णापुर ता. चोपडा) विवाहितेचे नाव आहे. ती पती, एक मुलगा, एक मुलगी यांच्यासह राहत होती. मजुरी काम करून तिचे पती उदरनिर्वाह करीत आहेत. दरम्यान सोमवारी दि. २५ जुलै रोजी नेहमीप्रमाणे डांभुर्णी येथून शेतामध्ये तुळसाबाई, त्यांचे पती रमेश आणि चार वर्षांची मुलगी गायत्री शेतात मजुरीसाठी जात होते. (केसीएन) कोळन्हावी गावाजवळ आले असताना त्यांची दुचाकी घसरली. अपघातात तुळसाबाई रस्त्यावर पडली.
तिच्या डोक्याला मागील बाजूने गंभीर मार लागला. तातडीने तिला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी तपासून तुळसाबाई हिला मयत घोषित केले. डोळ्यासमोरच अपघातात पत्नी गेल्यामुळे पतीने आक्रोश केला.
या घटनेप्रकरणी आता यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. दरम्यान, दोन्ही मुलं आईच्या मायेला पोरकी झाल्यामुळे यावल आणि चोपडा तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.